Thursday, August 26, 2010

प्रभाकर पेंढारकर – नम्र माणूस


सुप्रसिद्ध लेखक, कथा-कादंबरीकार, पटकथा –संवादलेखक, दिग्दर्शक अशा अनेक भूमिका लीलया पेलणार्‍या आदरणीय प्रभाकर पेंढारकरांशी माझी कशी ओळख झाली आणि धनंजय – चंद्रकांतमधून त्यांनी केलेल्या लेखनामुळे वेगळ्या वाचकवर्गात ह्या अंकांचा आलेख कसकसा चढत गेला, याची जन्मकथा मोठी रोचक आहे.
                  साधारणपणे ११-१२ वर्षांपूर्वी मला माझा जेजेतील मित्र सतीश कोळवणकरच्या बायकोचा- शीतलचा फोन आला. अंजू, रारंगढांग  वाचलंयस? मी प्रामाणिकपणे  नाही असं कबूल केलं. माझं वाचन तसं कमीच. वाच एकदा!” सांगून ती त्या कादंबरीच्या   कौतुकात रंगूनच गेली. अर्थात हे कौतुक पेंढारकरांचं होतं. तिचं सांगणं मनावर घेतच जणू मी लगेचच पुस्तक विकत आणून वाचायला सुरवात केली. झपाटल्यागत वाचून काढलं आणि ठरवलं, बस्सं, हे लेखक आपल्याकडे हवेतच. त्यासाठी नेटाने प्रयत्न करायचा. आणि हो, माझा अनुभव आहे, की मनापासून प्रयत्न केलेत तर काही काळाने का होईना, ते फळास येतात. पेंढारकरांना फोन केला. त्यावेळी ते वांद्र्याच्या साहित्यसहवास मधे रहायचे. अलिकडे पुण्यात शिफ्ट झालेत. अतिशय मृदूभाषी, हळूवार आणि प्रेमळवृत्तीचा माणूस ! इतकं की, त्यांचं केवळ बोलणं जरी ऐकलं तरीही मन प्रसन्न व्हावं. लहान मोठं अशा सार्‍यांशीच त्यांचं आदराने, आपुलकीने वागणं नकळतपणे आपलंसं करून टाकतं. फोनवरून त्यांची वेळ घेतली आणि काही दिवसांनी त्यांच्या घरी गेलो. पेंढारकर उभयतांनी उत्तम पाहुणचार केला.
                   या भेटीमध्ये त्यांनी मला त्यांचं एक पुस्तक दिलं. बोलता बोलता मी त्यांना धनंजय – चंद्रकांतला आपलं साहित्य हवं आहे, अशी विनंती करत त्यांच्या हाती दोन्ही अंक दिले. अंकांचं स्वरूप काय असतं, त्यांचे विषय, स्वभाव याबद्दल सांगितलं. बघतो, म्हणाले. त्या शब्दांमधली सुप्त आश्वासकता घेत खुशीत परतलो. त्यांच्या या सकारात्मक प्रतिसादाने अर्धी लढाई जिंकल्याचा एकूण आविर्भाव माझ्यात संचारला होता. वरचेवर फोन करत होतो, दरवर्षी अंक देत होतो. त्यांच्या शब्दांनी मनात जागवलेली आस तगवून ठेवली होती. अनमोल काही हवं तर त्यासाठी कमालीचा संयम, धीर तर हवाच. पेंढारकरसाहेब नाही म्हणाले नाहीत, यातच सारंकाही आलं.
                २००५ सालची दिवाळी धनंजय आणि चंद्रकांतसाठी, त्यांच्या वाचकांसाठी आनंदाची ठरली. दोन्ही अंकांकरिता पेंढारकरांनी अप्रतिम लेख दिले. ते गाजलेही. आणि त्यांच्या लेखनसहभागाने हे अंक वेगळ्या साहित्य वर्तुळात गेले. नामांकितांचे असे जे वर्तुळ आपल्याकडे म्हटले जाते, त्यात शिरकाव करायचा अगर त्यांना आपल्यापर्यंत आणायचं, यात अंकांनी बाजी मारली. तोवर या अंकांकडे काहीसं दुर्लक्ष करणार्‍यांनाही आपली दखल घेणं भाग पडलं. यावर्षीच्या अंकांची चर्चा झाली.
                गेली २५ वर्षे नित्यनेमाने मी मा. प्रा. डॉ. विजया राजाध्यक्ष यांना अंक पाठवत आहे. निदान त्यांनी ते अंक चाळावेत, ही त्यामागील मनोधारणा!  त्या वर्षी मॅडमनी दोन्ही अंकांतील प्रभाकर पेंढारकरांचे लेख वाचले आणि त्यांनी थेट फोन लावला तो श्री. पु. भागवतांना!  मौजच्या  दिवाळी अंकात पेंढारकर का नाहीत? ते मौजेत हवेत.  दिवाळी २००५ पर्यंत मौज दिवाळी अंकात पेंढारकर लिहीत नसत किंवा मौजही त्यांच्याकडून साहित्य मागवतही नसे. मात्र २००६ पासून श्री.पुं.नी फोन केला आणि पेंढारकर मौजेच्या दिवाळी अंकात नियमित लिहू लागले. हा सारा प्रसंग पेंढारकरसाहेबांनीच मला सांगितला. वास्तविक पाहता रारंगढांग, अरे संसार संसार ह्या त्यांच्या कादंबर्‍या मौजेनेच प्रकाशित केल्या असल्याने ते मौजेचे लेखक होते. तरीही मौजेच्या दिवाळी अंकात त्यांनी तोवर कधीच लिहीलं नसल्याने ती संधी आपल्या अंकांमुळे मिळाल्याचं सांगताना त्यांच्या स्वभावातली ऋजूता स्पर्शून गेली. अतिशय आनंदित स्वरांत ते असं काही रंगवून सांगत होते की, हे जे काही घडलं ते खरोखरंच आपल्याचमुळे याबद्दल समोरच्याला खात्रीच पटावी. आम्ही निमित्तमात्र होतो. त्यांच्या लेखनामुळे एलिट क्लासमधेही हे अंक पोचल्याचं एक असीम समाधान मिळालं होतं  
                पेंढारकरांचा प्रत्येक लेख हा तोलून मापून, घडीव शब्दांचा असतो. असे लेख अंकांसाठी लाभणं हिच अभिमानाची बाब असते आणि त्यानंतर त्यांचे  एका स्टुडिओचे आत्मवृत्त प्रकाशित करण्याची जबाबदारी राजेंद्र प्रकाशनावर सोपवली तेव्हाचा आनंद तर विलक्षण होता.
त्याविषयी ओघाने येईलच पुढे.. .......  

No comments:

Post a Comment