Friday, July 23, 2010

८.४१ ची लोकल

आपल्या प्रत्येकाचं वर्षभरांचे बर्या पैकी नियोजन असतं. अगदी चोवीस तासांचसुद्धा असावं. कारण येणार्याप त्या क्षणांसाठी आपण आत्ता आनंदात असतो. उत्सुकता, उत्कंठा रक्तात लयबद्ध लाटा निर्माण करतात. कल्पना करा, लाल रंगाचा, दाट रक्ताचा तुमच्या शरीरात उसळणारा समुद्र. आणि आपण आपल्या आतल्या डोळ्यांनी किनार्याठवर तटस्थतेने शांत बसून तो न्याहाळतोय......
गेली २१ वर्षे मी दररोज सकाळी ८.४१ची लोकल बोरिवलीहून पकडतोय. पूर्वी ती १ वा २ प्लॅटफॉर्मवरून सुटत असे, आता मात्र सातवरून निघते. तिच्या वेळेत एकूणच रेल्वेच्या बदलत्या वेळापत्रकानुसार एक-दोन मिनिटं मागेपुढे काय तो बदल. या दैनंदिन प्रवासाने मला अर्थात राजेंद्र शंकरराव कुळकर्णीला अनेक सुहृद जोडून दिले. माणसांचे नाना नमुने या एका अखंड प्रवासादरम्यान तुम्हाला बरंच काही देऊन जात असतात.
आमचा ग्रुपही असाच अफाट आहे. कोणीही एका फिल्डमधला नाही. त्यामुळे आपोआपच विषयांचं वैविध्य, आपापल्या मतांची देवाणघेवाण, वाद हा सगळा मामला आलाच. एकमेकांना खेचण्यात, टपल्या मारण्यात, घोळात घेण्यात ही मंडळी एकदम पटाईत.... तरीही हे सारं एका ठराविक मर्यादेत, परस्परांना सांभाळून घेतच सुरू असतं हे सांगायला नकोच. आजारपणात, आनंदाच्या प्रसंगी जवळ येणारे, वर्षातून किमान एकदा फॅमिलीसह पिकनिकला जाणारे आम्ही सारे. आमच्या ग्रुपमधल्या प्रत्येकाजवळ त्यातल्या सभासदांच्या नाव पत्ता, मोबाईल नंबर्स, ई मेल सह अद्ययावत यादी असतेच. इमर्जन्सीमधे हाच माहितीचा दस्तावेज मदतीला आधी धावून येणार आहे. मी इथे मुद्दाम या सभासदांची यादी देतोय....त्यातलं वयाचं अंतर, शिक्षण – व्यवसाय ह्यात महद् अंतर असलं तरीही माणूसकी आणि आपुलकीच्या नात्याची ओढ कसं प्रत्येकालाच बांधून टाकते, हे त्यातून उदाहरण म्हणून समजून यावं, एवढाच त्यामागील हेतू.
१. क्रिसेंट फर्नांडिस(७१) ए.सी.चा व्यवसाय, २. स्वामिनाथन(६५) बिर्ला ग्रुप- जी.एम. ३. नाना नाखरेकर( ६२) सौभाग्य अॅड एजन्सी, ४. विभाकर पारेख(६२), ५. उन्नीकृष्णन(५६) असि. डायरेक्टर नॅशनल सेफ्टी कौन्सिल, ६. जयराम आहुजा( ५६) फर्निचर बिझनेस, ७. विजयकुमार (५१) कलानिकेतन, ८. किरण साने(४९) वेस्टर्न रेल्वे, ९. देवेंद्र देशमुख(३६) इंजिनिअर, १०. अॅडली फर्नांडिस(३५), ११. सौरभ पाटील(३४) इंजिनिअर, १२. अभिषेक चौधरी( ३१) एम.एस.सी.बी., १३. सिद्धेश भोळे( २७) वकील, १४. राजशेखर पेडणेकर(४१) न्यू इंडिया अॅश्युअरन्स बँक, १५. राजू बावडी(३८) सचिवालय, १६. भूषण गांगल (२१) सी.ए. चा विद्यार्थी, हा आणि ह्याचे दोन मित्र बोरिवलीहून पार्ले टिळक शाळेत जायचे तेव्हापासून आमच्या ग्रुपमधले....यादी अजून मोठी होईल..तूर्तास इतकंच म्हणतो की, अनेकजण यात येतात- जातात. कधी दुरूनच आमची धमाल बघत असतात, तर कधी आपणहून आमच्यात सामील होतात. आम्हीही त्यांना सामावून घेतो......खेचायला तेवढंच नवं माणूस मिळतं ना महाराज...
परस्परांच्या कामाबद्दल, कार्यक्षमतेबद्दल सगळ्यांनाच कल्पना आहे. रोजच्या घडामोडींपासून ते अगदी वैयक्तिक सुखदुखांच्या अवकाशात तितक्याच समरसतेने मिसळणारे आम्ही... हा ग्रुप माझ्यासाठी टॉनिक आहे, त्यांच्या सहवासात प्रोत्साहन तर मिळतंच, शिवाय मनावरचे ताण काहीसे हलके व्हायलाही मदत होते. प्रवास मग तो रेल्वेचा असो किंवा आयुष्याचा त्याच्या मार्गावर भेटणारा प्रत्येकजण आपल्यासाठी त्याच्या अनुभवांची शिदोरी घेऊन येत असतो आणि आपण सारेच अखेरपर्यंत जीवनाचे अनेक रंग, पैलूंशी या ना त्या रूपात बांधले जातो, शिकत जातो...समृद्ध होत जातो.

1 comment:

  1. Very true. The way travelling enriches our lives and mind is unparalleled... perhaps that's why the phrase "kelyane deshatan.." is still so popular...

    ReplyDelete