Friday, September 3, 2010

टोपण नावाचं रहस्य


वाचकांशी आमचा संवाद वर्षातून एकदाच दिवाळी अंकाच्या माध्यमातून होत असतो. वाचकांचा सहवास लाभावा आणि त्यांच्याशी संवादही वाढावा याकरिता २००५ आणि ०६ साली धनंजय आणि चंद्रकांतचे वासंतिक विशेषांक प्रकाशित केले. त्यावेळी २००६च्या चंद्रकांतच्या विशेषांकासाठी एका नवीन लेखकाची कथा आली. त्यांचं नाव होतं, अनंत अग्निहोत्री. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लेखकाचा पत्ता ना हस्तलिखितावर होता ना पाठवलेल्या पाकिटावर किंवा साधं दोन ओळींचं पत्रही त्यात नाही. काहीशा अचंबित अवस्थेतच कथा वाचली. उत्तम होती. लेखकाचं नाव जरी नवीन असलं तरीही कथा घ्यायची, असं ठरवलं. नेमक्या शब्दांत मांडलेली, हृदयस्पर्शी कथा लिहिणार्‍याचा शोध घ्यायला हवा, असं मनानं घेतलं. का कुणास ठाऊक पण ते पाकिट जपून ठेवलं होतं. त्या पाकिटावर, हस्तलिखितावर जरा काहीशा बारकाईने आणि उत्सुकतेनेच नजर रोखली. बस्ताक्षर परिचयाचं वाटलं. लेखनाचा दर्जा हा कसलेल्या लेखकाचा होता. पाकिटावर पुण्याचा पुसटसा स्टँप होता. मनं सांगत होतं, की ह्या गूढ लेखकाचा ठावठिकाणा लवकरच लागणार. अण्णांच्या वेळचे सिनिअर मोस्ट टॉपचे लेखक – त्यांना फोन केला. सुरवातीला काहीच बोलले नाहीत. याबाबत आपल्याला काहीच कल्पना नाही, असं म्हणाले. मीही हेका सोडायला तयार नव्हतोच. बेधडकपणे सांगून टाकलं, मानधनाचा ड्राफ्ट मी तुमच्याच नावे पाठवतो आहे, कारण हस्ताक्षर तुमचंच आहे. माझ्या ठाम पवित्र्यापुढे त्यांचा बहुतेक नाईलाज झाला असावा, त्यांनी अखेरीस मान्य केलं, की तेच अनंत अग्निहोत्री आहेत. नवोदित लेखकाला अंकात स्थान मिळतं किंवा नाही, हे त्यांना पहायचं होतं. आणि तशातही त्यांना नेहमीच्या भय कथा, गूढ कथेपेक्षा वेगळी सामाजिक कथा लिहायची होती..... ते अनंत अग्निहोत्री म्हणजे नारायण धारप होते. धनंजयकरिता दिवसरात्र एक करता करता या घटनेने क्षणभर का होईना, मला धनंजय झाल्याचं समाधान मिळालं. इतकंच नाही तर नारायण धारपांनीदेखिल मी अनंत अग्निहोत्री असं टोपण नाव धारण करणारा खरा कोण ते शोधून काढल्याबद्दल माझं कौतुक केलं. संपादकाच्या पाठीवर ज्येष्ठ साहित्यिकांची अशीही थाप दुर्मिळच नाही का?

No comments:

Post a Comment