Wednesday, September 8, 2010

अजब योगायोग


गेल्या वर्षी ८ सप्टेंबर २००९ मधे मा. प्रभाकर पेंढारकरांचं एका स्टुडिओचे आत्मवृत्त पुस्तक प्रकाशित झालं. आणि वर्षभरातच या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या तर निघाल्याच शिवाय त्या पुस्तकाला केसरी मराठा ट्रस्ट, पुणे यांचा उत्कृष्ट स्मृतिग्रंथाचा न.चिं. केळकर ग्रंथोत्तेजक पुरस्कारही मिळाला. खरंच, पुस्तक प्रकाशनाला घेताना त्यामागची सगळी धावपळ, दगदग, ओढगस्ती हे एका क्षणात अशा कौतुकाने, वाचकांच्या अलोट प्रेमाने क्षणात गायब होऊन जातं आणि अधिक चांगल्या कामासाठी एक उमेद तनामनात ग्लुकोजसारखी भिनत जाते.
असो, आजचा विषय तो नाहीच. गेल्याखेपेस मी म्हटलं होतं की, पेंढारकरांविषयी मी ओघात पुढे सांगेन. तर त्याच एका अनाहूतपणे जुळून आलेल्या योगायोगाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतो. मा. पेंढारकरांचं कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओची आत्मकथा सांगणारं एका स्टुडिओचं आत्मवृत्त हे पुस्तक प्रकाशित करण्याचं भाग्य आम्हांला लाभलं. या पुस्तकावर दीड दोन वर्ष काम करीत होतो. पेंढारकरसाहेबांच्या अमोल शब्दांना चित्रकार संजय शेलार यांचे तितकेच बोलके मुखपृष्ठ, अप्रतिम पेन्सिल रेखाचित्रे आणि सुलेखनकार अच्युत पालव यांचे सुलेखन असा झकास मेळ यानिमित्ताने साधून आलेला होता. आता पुस्तक छपाईला जाण्यापूर्वी त्याच्या एका बाजूच्या पानावर इम्प्रिंट – प्रकाशक, लेखक, आवृत्ती वगैरे माहितीचा भाग टाईप केलेला असतो, ते महत्त्वाचं काम होणं बाकीच होतं. आणि तो महिना ऑगस्टचा होता. पेंढारकरांना ते पुस्तक २ जुलै रोजी म्हणजे आदरणीय भालजी पेंढारकरांच्या स्मृतिदिनी ते प्रसिद्ध व्हावे, असं वाटत होतं. मात्र ते शक्य नव्हतं. त्यामुळे दुसरा चांगला दिवस कोणता निवडता येईल, ते शोधत होतोच.
केवळ याचा मीच विचार न करता आणखीही काहीजणांची मतं मी चाचपडत होतो. त्यात पेंढारकर कुटुंबातल्याच श्रीकांत डिग्रजकरांना मी विचारलेलं होतं. पेंढारकर  साहेबांचा वाढदिवस कधी असतो? आठ  सप्टेंबर!” माझ्यादृष्टीने तो  दिवस योग्य होता आणि महत्त्वाचं म्हणजे पुस्तकही तोवर तयार होणार होतं. खुंटी हलवून बळकट करण्यासाठी पुण्याला सौ. इंदुताई पेंढारकरांशी बोललो. त्यांनीही आठ सप्टेंबर तारखेला दुजोरा दिला. माझ्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. शेवटी प्रभाकर पेंढारकरांच्या कानावर हे सगळं घालून त्यांची पुस्तकाच्या प्रकाशनाविषयी परवानगी घेतली. आणि पुस्तकावर इम्प्रिंटच्या पानावर प्रथम आवृत्ती ८ सप्टेंबर २००९ अशी घातली. पुस्तक छपाईला रवाना झालं. वाचकहो, योगायोगाची गोष्ट म्हणजे ८ सप्टेंबर हा दिवस मदर मेरी, प्रख्यात गायिका आशा भोसले यांचाही जन्मदिन आणि माझ्यासारख्या एका धनंजयप्रेमी माणसाचाही. गंमतीचा भाग म्हणून ही गोष्ट पेंढारकरांच्या कानावर घालताच लेखक, प्रकाशकाच्या आणि पुस्तक प्रकाशनाच्याही एकाच दिवशी जुळून आलेल्या अजब योगाला त्यांनीही व्वा, व्वा!” म्हणत दिलखुलास दाद दिली आणि या पुस्तकाने किती समाधान मिळवून दिलं, हे कोणत्या शब्दांत व्यक्त करू?.... माझे शब्दच थिजून जातात.

Friday, September 3, 2010

टोपण नावाचं रहस्य


वाचकांशी आमचा संवाद वर्षातून एकदाच दिवाळी अंकाच्या माध्यमातून होत असतो. वाचकांचा सहवास लाभावा आणि त्यांच्याशी संवादही वाढावा याकरिता २००५ आणि ०६ साली धनंजय आणि चंद्रकांतचे वासंतिक विशेषांक प्रकाशित केले. त्यावेळी २००६च्या चंद्रकांतच्या विशेषांकासाठी एका नवीन लेखकाची कथा आली. त्यांचं नाव होतं, अनंत अग्निहोत्री. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लेखकाचा पत्ता ना हस्तलिखितावर होता ना पाठवलेल्या पाकिटावर किंवा साधं दोन ओळींचं पत्रही त्यात नाही. काहीशा अचंबित अवस्थेतच कथा वाचली. उत्तम होती. लेखकाचं नाव जरी नवीन असलं तरीही कथा घ्यायची, असं ठरवलं. नेमक्या शब्दांत मांडलेली, हृदयस्पर्शी कथा लिहिणार्‍याचा शोध घ्यायला हवा, असं मनानं घेतलं. का कुणास ठाऊक पण ते पाकिट जपून ठेवलं होतं. त्या पाकिटावर, हस्तलिखितावर जरा काहीशा बारकाईने आणि उत्सुकतेनेच नजर रोखली. बस्ताक्षर परिचयाचं वाटलं. लेखनाचा दर्जा हा कसलेल्या लेखकाचा होता. पाकिटावर पुण्याचा पुसटसा स्टँप होता. मनं सांगत होतं, की ह्या गूढ लेखकाचा ठावठिकाणा लवकरच लागणार. अण्णांच्या वेळचे सिनिअर मोस्ट टॉपचे लेखक – त्यांना फोन केला. सुरवातीला काहीच बोलले नाहीत. याबाबत आपल्याला काहीच कल्पना नाही, असं म्हणाले. मीही हेका सोडायला तयार नव्हतोच. बेधडकपणे सांगून टाकलं, मानधनाचा ड्राफ्ट मी तुमच्याच नावे पाठवतो आहे, कारण हस्ताक्षर तुमचंच आहे. माझ्या ठाम पवित्र्यापुढे त्यांचा बहुतेक नाईलाज झाला असावा, त्यांनी अखेरीस मान्य केलं, की तेच अनंत अग्निहोत्री आहेत. नवोदित लेखकाला अंकात स्थान मिळतं किंवा नाही, हे त्यांना पहायचं होतं. आणि तशातही त्यांना नेहमीच्या भय कथा, गूढ कथेपेक्षा वेगळी सामाजिक कथा लिहायची होती..... ते अनंत अग्निहोत्री म्हणजे नारायण धारप होते. धनंजयकरिता दिवसरात्र एक करता करता या घटनेने क्षणभर का होईना, मला धनंजय झाल्याचं समाधान मिळालं. इतकंच नाही तर नारायण धारपांनीदेखिल मी अनंत अग्निहोत्री असं टोपण नाव धारण करणारा खरा कोण ते शोधून काढल्याबद्दल माझं कौतुक केलं. संपादकाच्या पाठीवर ज्येष्ठ साहित्यिकांची अशीही थाप दुर्मिळच नाही का?

Wednesday, September 1, 2010

तृतीय नेत्र उघडला...


परवाच्या शनिवारी (२८ ऑगस्ट २०१०) निवडक धनंजय तुतीय नेत्र चे धनंजय स्टाइलने प्रकाशन झाले. नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या हस्ते आणि लेखिका  अनुराधा वैद्य, लेखक –पटकथाकार, दिग्दर्शक मा. यशवंत रांजणकर, प्रो. डॉ. शिरीष गो. देशपांडे यांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला.
मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात सुरवातीस लेखक – वाचक ओळख, चर्चेतून एक मनमोकळा संवाद घडला. धनंजय अंकाच्या प्रारंभापासून ज्या व्यक्तींचा स्नेह जुळला अशांपैकी काही व्यक्ती या समारंभामधे सामील झाल्याने खर्‍या अर्थाने हे सुवर्णक्षण वेचण्याजोगे झाले होते. कै. शंकरराव कुलकर्णी यांनी रहस्यकथा, गूढकथा आदी दुर्लक्षित साहित्यप्रकाराला एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा जो चंग बांधला होता; त्याचा वटवृक्ष होताना त्यांच्या काही सुहृदांना तो पाहण्याचे भाग्य मिळणे, ही नक्कीच धनंजय परिवाराकरिता आनंदाची बाब होती. कै. शंकररावांशी परीचित असणार्‍यांनी आपल्या याबद्दलच्या कृतज्ञता यावेळी व्यक्त केल्या. हे खरं तर आज काम करणार्‍यांकरिता आशीर्वादापेक्षा कमी नव्हतंच. अण्णांनी पाठीवर शाबासकीची थाप दिली, असं वाटावं इतकी भावूकता त्या प्रसंगी दाटून आली होती.
लेखक वाचक ओळख, संवादाच्या कार्यक्रमाचे एका मारवाड्याची गोष्ट, कृष्णनीति लिहीणारे लेखक गिरीश जाखोटिया अध्यक्ष होते. तर लेखक प्रतिनिधी म्हणून शुभदा गोगटे आणि बशीर मुजावर वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. रहस्यकथांना आणि त्या कथालेखकांना मिळणार्‍या दुर्लक्षित वागणूकीबद्दल, विज्ञानकथा आणि रहस्य, गूढ कथा यांच्या स्वरूपाविषयीही यात प्रश्नोत्तरे झाली. मुलुंडच्या न. चिं. केळकर ग्रंथालयातील वाचकांचाही यात उत्स्फूर्त सहभाग मिळाला. धनंजयने जोपासलेली वाचनसंस्कृती, विषयांचे दिलेले दर्जेदार वैविध्य याचंही उपस्थितांकडून कौतुक झालं. या सगळ्या प्रोत्साहनाच्या वर्षावाने इथवरच्या वाटचालीचे श्रम कुठल्याकुठे पळाले. येत्या दिवाळीला धनंजय घेऊन येत असलेल्या अनोख्या प्रयोगाचे सूतोवाच यावेळी करण्यात आल्यानंतर सर्वांनाच त्याविषयीची उत्सुकता लागून राहिलेली दिसून आली. त्याविषयी इथे नंतर सांगणारच आहे.
पुस्तक प्रकाशन प्रसंगी गूढ वातावरणाची हलकीशी निर्मिती करून काळोख्या मार्गावरून तृतीय नेत्रंच स्टेजवर आगमन झालं आणि नटश्रेष्ठ पणशीकर यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी बोलताना मराठवाड्याच्या लेखिका अनुराधा वैद्य म्हणाल्या, मुंबई वगळता अन्य महाराष्ट्रातील लेखकांची पुस्तके प्रकाशित करताना दर्जाच्याबाबतीत प्रकाशक फारशी उत्सुकता दाखवत नाहीत. परंतु मला मात्र राजेंद्र प्रकाशनाबाबत वेगळा अनुभव आला. माझी श्वानप्रस्थ कादंबरी प्रकाशित करताना ते माझ्या संकल्पनेबरहुकूम, हव्या त्या पेपर क्वालिटीचं, आकर्षक मुखपृष्ठ असलेलं असं करून देण्यासाठी कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. चंद्रकांतसाठी सामाजिक कथा- कादंबर्‍या लिहिणार्‍या माझ्याकडून त्यांनी गूढ कथा लिहवून घेतली, हे खर्‍या संपादकाचं लक्षण आहे. त्यांच्या वाटचालीस माझ्याकडून अनेक शुभेच्छा!” प्रो. डॉ. शिरीष गो. देशपांडे यांनी तृतीय नेत्र या शीर्षकामागील भूमिका स्पष्ट केली आणि विज्ञान कथा आणि रहस्य कथा यांतील भेदाभेद विशद केला. धनंजयचा  सुवर्णमहोत्सव हा कै. शंकरराव कुलकर्णी यांनी उपेक्षित रहस्यकथांना दिलेल्या हक्काच्या व्यासपीठाचा, त्यांच्या हिकमती विचारी कृतीचा गौरव आहे. राजेंद्र आणि नीलिमा कुलकर्णी या दांपत्याने आणि त्यांच्या परिवाराने यासाठी आजवर घेतलेल्या मेहनतीला मिळालेलं हे फळ आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या शुभेच्छा नोंदवल्या. नटश्रेष्ठ पणशीकरांचा आणि अण्णांचा स्नेह हा खूप जुना, अगदी घरोब्याचा. त्यामुळे त्यांचं असणं हे जणू ज्येष्ठांचाच वरदहस्त डोक्यावर असल्यासारखं होतं. कै. शंकरराव(अण्णा) यांच्याशी असलेल्या स्नेहपूर्ण संबंधांची याद जागवत त्यांनी धनंजयच्या यशस्वी वाटचालीकरता कुलकर्णी दांपत्य आणि परिवाराने घेतलेल्या कष्टांचं कौतुक केलं. आणि पुढील ७५ वर्षांची वाटचाल आपल्याला पहायला मिळावी, अशी सदिच्छाही व्यक्त करत अनेक आशीर्वाद दिले. याप्रसंगी ज्येष्ठ लेखक यशवंत रांजणकर यांचा पणशीकरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सूत्रं नीलिमा कुलकर्णी यांनी सांभाळली होती. या कार्यक्रमादरम्यान लेखक शिरीष कणेकर यांची प्रमोशन आणि राही अनिल यांची रस्त्यावरचं पोर ही कथा प्राजक्त दातार या कॉलेजयुवकाने यथायोग्य प्रभावी वातावरणाचा आभास निर्माण करत वाचली. न.चिं. केळकर ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमाअंती ग्रंथालय अध्यक्ष डी. व्ही. कुलकर्णी यांनी समस्त मान्यवरांचे, उपस्थितांचे आभार मानले.
निवडक धनंजय तृतीय नेत्र पुस्तकामधे गेल्या ५० वर्षांतील मातब्बर लेखकांच्या निवडक कथांचे संकलन आहे. त्यात श्रीकृष्ण पोवळे, र.म. शेजवलकर, अण्णाभाऊ साठे, यशवंत रांजणकर, प्रदीप दळवी, अनंत सामंत, इंद्रायणी सावकार, श्रीकांत सिनकर, राजा पारगावकर, गजानन क्षीरसागर, सुहास शिरवळकर, अनुराधा वैद्य, बा.सी.अष्टीकर, शिरीष कणेकर, व.कृ. जोशी, श्रीकांत मुंदरगी आणि नारायण धारप तर विज्ञानदृष्टी असलेले डॉ. बाळ फोंडके, निरंजन घाटे, शुभदा गोगटे, मोहन आपटे, डॉ. आ.वा. वर्टी अशी लेखक मंडळी आहेत. रहस्यकथांचा हा प्रवाह आज मुख्य साहित्य प्रवाहात समाविष्ट होण्याच्या प्रतिक्षेत आहे. मानवी जीवनाची उकल कलापूर्ण कथात्मकतेने करण्याची ऐपत रहस्यादी कथालेखकांनी कमावलेली आहे. चळवळ करून प्रमुख प्रवाहात शिरण्यापेक्षा सन्मानाने, स्वसामर्थ्याने सामील होण्यासाठी ते उत्सुक आहे. आणि यासाठी आजवर वाचकांचाही उदंड प्रतिसाद लाभल्यानेच हे आत्मबळ त्याला मिळालेलं आहे.. तेव्हा प्रबळ सामर्थ्याने ही उपेक्षा लवकरच सरो आणि आमचे आकाश – अवकाश आम्हांस मिळो, हिच सदिच्छा.     

Thursday, August 26, 2010

प्रभाकर पेंढारकर – नम्र माणूस


सुप्रसिद्ध लेखक, कथा-कादंबरीकार, पटकथा –संवादलेखक, दिग्दर्शक अशा अनेक भूमिका लीलया पेलणार्‍या आदरणीय प्रभाकर पेंढारकरांशी माझी कशी ओळख झाली आणि धनंजय – चंद्रकांतमधून त्यांनी केलेल्या लेखनामुळे वेगळ्या वाचकवर्गात ह्या अंकांचा आलेख कसकसा चढत गेला, याची जन्मकथा मोठी रोचक आहे.
                  साधारणपणे ११-१२ वर्षांपूर्वी मला माझा जेजेतील मित्र सतीश कोळवणकरच्या बायकोचा- शीतलचा फोन आला. अंजू, रारंगढांग  वाचलंयस? मी प्रामाणिकपणे  नाही असं कबूल केलं. माझं वाचन तसं कमीच. वाच एकदा!” सांगून ती त्या कादंबरीच्या   कौतुकात रंगूनच गेली. अर्थात हे कौतुक पेंढारकरांचं होतं. तिचं सांगणं मनावर घेतच जणू मी लगेचच पुस्तक विकत आणून वाचायला सुरवात केली. झपाटल्यागत वाचून काढलं आणि ठरवलं, बस्सं, हे लेखक आपल्याकडे हवेतच. त्यासाठी नेटाने प्रयत्न करायचा. आणि हो, माझा अनुभव आहे, की मनापासून प्रयत्न केलेत तर काही काळाने का होईना, ते फळास येतात. पेंढारकरांना फोन केला. त्यावेळी ते वांद्र्याच्या साहित्यसहवास मधे रहायचे. अलिकडे पुण्यात शिफ्ट झालेत. अतिशय मृदूभाषी, हळूवार आणि प्रेमळवृत्तीचा माणूस ! इतकं की, त्यांचं केवळ बोलणं जरी ऐकलं तरीही मन प्रसन्न व्हावं. लहान मोठं अशा सार्‍यांशीच त्यांचं आदराने, आपुलकीने वागणं नकळतपणे आपलंसं करून टाकतं. फोनवरून त्यांची वेळ घेतली आणि काही दिवसांनी त्यांच्या घरी गेलो. पेंढारकर उभयतांनी उत्तम पाहुणचार केला.
                   या भेटीमध्ये त्यांनी मला त्यांचं एक पुस्तक दिलं. बोलता बोलता मी त्यांना धनंजय – चंद्रकांतला आपलं साहित्य हवं आहे, अशी विनंती करत त्यांच्या हाती दोन्ही अंक दिले. अंकांचं स्वरूप काय असतं, त्यांचे विषय, स्वभाव याबद्दल सांगितलं. बघतो, म्हणाले. त्या शब्दांमधली सुप्त आश्वासकता घेत खुशीत परतलो. त्यांच्या या सकारात्मक प्रतिसादाने अर्धी लढाई जिंकल्याचा एकूण आविर्भाव माझ्यात संचारला होता. वरचेवर फोन करत होतो, दरवर्षी अंक देत होतो. त्यांच्या शब्दांनी मनात जागवलेली आस तगवून ठेवली होती. अनमोल काही हवं तर त्यासाठी कमालीचा संयम, धीर तर हवाच. पेंढारकरसाहेब नाही म्हणाले नाहीत, यातच सारंकाही आलं.
                २००५ सालची दिवाळी धनंजय आणि चंद्रकांतसाठी, त्यांच्या वाचकांसाठी आनंदाची ठरली. दोन्ही अंकांकरिता पेंढारकरांनी अप्रतिम लेख दिले. ते गाजलेही. आणि त्यांच्या लेखनसहभागाने हे अंक वेगळ्या साहित्य वर्तुळात गेले. नामांकितांचे असे जे वर्तुळ आपल्याकडे म्हटले जाते, त्यात शिरकाव करायचा अगर त्यांना आपल्यापर्यंत आणायचं, यात अंकांनी बाजी मारली. तोवर या अंकांकडे काहीसं दुर्लक्ष करणार्‍यांनाही आपली दखल घेणं भाग पडलं. यावर्षीच्या अंकांची चर्चा झाली.
                गेली २५ वर्षे नित्यनेमाने मी मा. प्रा. डॉ. विजया राजाध्यक्ष यांना अंक पाठवत आहे. निदान त्यांनी ते अंक चाळावेत, ही त्यामागील मनोधारणा!  त्या वर्षी मॅडमनी दोन्ही अंकांतील प्रभाकर पेंढारकरांचे लेख वाचले आणि त्यांनी थेट फोन लावला तो श्री. पु. भागवतांना!  मौजच्या  दिवाळी अंकात पेंढारकर का नाहीत? ते मौजेत हवेत.  दिवाळी २००५ पर्यंत मौज दिवाळी अंकात पेंढारकर लिहीत नसत किंवा मौजही त्यांच्याकडून साहित्य मागवतही नसे. मात्र २००६ पासून श्री.पुं.नी फोन केला आणि पेंढारकर मौजेच्या दिवाळी अंकात नियमित लिहू लागले. हा सारा प्रसंग पेंढारकरसाहेबांनीच मला सांगितला. वास्तविक पाहता रारंगढांग, अरे संसार संसार ह्या त्यांच्या कादंबर्‍या मौजेनेच प्रकाशित केल्या असल्याने ते मौजेचे लेखक होते. तरीही मौजेच्या दिवाळी अंकात त्यांनी तोवर कधीच लिहीलं नसल्याने ती संधी आपल्या अंकांमुळे मिळाल्याचं सांगताना त्यांच्या स्वभावातली ऋजूता स्पर्शून गेली. अतिशय आनंदित स्वरांत ते असं काही रंगवून सांगत होते की, हे जे काही घडलं ते खरोखरंच आपल्याचमुळे याबद्दल समोरच्याला खात्रीच पटावी. आम्ही निमित्तमात्र होतो. त्यांच्या लेखनामुळे एलिट क्लासमधेही हे अंक पोचल्याचं एक असीम समाधान मिळालं होतं  
                पेंढारकरांचा प्रत्येक लेख हा तोलून मापून, घडीव शब्दांचा असतो. असे लेख अंकांसाठी लाभणं हिच अभिमानाची बाब असते आणि त्यानंतर त्यांचे  एका स्टुडिओचे आत्मवृत्त प्रकाशित करण्याची जबाबदारी राजेंद्र प्रकाशनावर सोपवली तेव्हाचा आनंद तर विलक्षण होता.
त्याविषयी ओघाने येईलच पुढे.. .......  

Wednesday, August 25, 2010

निवडक धनंजयच्या निमित्ताने....


परवा प्रकाशित होणार्‍या निवडक धनंजय – तृतीय नेत्र या स्मृतिग्रंथामधे तीन महनीय व्यक्तींचा सहभाग आहे. सुप्रसिद्ध लेखक यशवंत रांजणकर, रमेश के. सहस्त्रबुद्धे आणि धनंजयच्या मुखपृष्ठापासून ते आतील सजावटीचे सर्वेसर्वा चित्रकार र. स. कंटक. या तिघांनी आणि अर्थातच सर्वांनीही धनंजयवर, ती. अण्णांवर निस्पृह प्रेम केलं. अण्णांच्या कामातील आत्मियता, एकाग्रता, विषयाचा वेध घेण्याची वृत्ती, प्रत्येकाशी ममत्वाने –प्रेमाने बोलण्याची अंगभूत सवय.... किती गुण एकाच व्यक्तीच्या ठिकाणी असावेत?
या तीनही महनीय व्यक्तिंशी माझा नेहमीच संवाद असतो. दरखेपेस भरभरून बोलणं, जुन्या आठवणी जागवणं हे घडतच असतं. खरं तर तो त्यांच्या करीअरच्या सुरूवातीचा, उमेदीचा काळ. त्यांच्या बोलण्यातून अक्षरश जोमाने काम करण्याचं ट़ॉनिकच मिळत असतं.
ती. अण्णांनी यशवंत रांजणकरांचा पहिला कथासंग्रह आराधना प्रकाशित केला होता. त्याचे मुखपृष्ठ कंटकांचं होतं. छोटेखानी समारंभात ह्या पुस्तकाचं प्रकाशन प्रा. वि.ह.कुलकर्णी यांच्या हस्ते झालं होतं. तेव्हा ताज्या दमाचे लेखक असलेले रांजणकर आठवणी जागवताना आजही सांगतात की, त्यांना लेखक म्हणून पहिले मानधन अण्णांनी आणि बा.द. सातोस्कर (संपादक, प्रकाशक – दै. गोमंतक, गोवा) यांच्याकडून मिळालं होतं.
र. स. कंटकांनी तर धनंजय आणि चंद्रकांतचा कलाविभाग केवळ एकहाती सांभाळला एवढंच नव्हे तर अप्रतिम रेखाचित्रं, मुखपृष्ठाकरिता केलेले विविध प्रयोग आजही तितकेच ताजे आहेत. अण्णांनी त्यांच्यातली गुणवत्ता, प्रतिभा हेरूनच त्यांच्या सृजनशीलतेला पूर्ण मुभा दिलेली होती. धनंजयची शीर्षकं, सुलेखन , कथांची शीर्षकं यांतले वैविध्य तर थक्क करणारेच! कंटकांचे रिअॅलिस्टिक, कोलाज, ग्राफिक्स तर अप्रतिम होतेच शिवाय पेंटींग(वॉटर कलर), सिंगल कलर(ब्लॅक अॅण्ड व्हाइट), तर कधी फक्त २-३ रंगात(लाल, पिवळा, निळा)च चार रंगांचा इफेक्ट आणणं....यातलं पोटातलं गुपित असं की, त्यामुळे चौथ्या काळ्या रंगाचा खर्च वाचतो.... हे प्रकाशकाची काळजी घेत केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगेच!
अंकाला लेखकांचं साहित्य जसं उठाव आणतं त्याचप्रमाणे त्याला अनुलक्षून असलेली चित्रं, शीर्षकं, मुखपृष्ठ, अनुक्रमणिका, कथाचित्रं अशांचाही परिणाम फार मोठा असतो. ह्या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक ठरल्यास वाचनाचा आनंद, समाधान अनेक पटींनी वाढतं.
या बरोबरच अंक हाती पडला की संपूर्ण कथा, कादंबरी काही लगेच एका नजरेत वाचून होत नाही. अशा वेळी वाचकाचं पहिलं लक्ष जातं ते पानपूरके आणि चौकटींकडे. अतिशय थोडक्यात, अल्प शब्दांत माहितीपूर्ण चौकटी देण्याची प्रथा धनंजयने सुरू केली. यात अगदी पहिल्या अंकापासून रमेश के. सहस्त्रबुद्धे यांचा त्याकरिता सहभाग लाभला. धनंजयला रहस्यकथांचा बादशहा अशी उपाधी मिळाली आहे तशी चौकटींचा बादशहा अशी सहस्त्रबुद्धे यांना मिळायला हरकत नाही. सहस्त्रबुद्धे आणि माझी ओळख व्हायला एक इव्हेंट कारण ठरला. सहस्त्रबुद्धेंच्या करीअरची सुरवातच चित्रपट माध्यमातून झालेली. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्युटमधे त्यांनी फिल्म अॅप्रिसिएशनचा कोर्स केला आणि तिथेच काही वर्षे कामही केलं. १९६८च्या सुमारास नॉव्हेल्टी थिएटरमधे फिल्म इन्स्टिट्युटचे गॅदरिंग होतं. त्याचा पास त्यांनी अण्णांना दिला. माझं सिनेमावेड अण्णांना ठाऊक असल्याने त्यांनी तो पास मला दिला. असरानी, शत्रूघ्न सिन्हा वगैरे संस्थेतली सिनिअर मंडळी तिथे हजर होती. जया भादुरी बहुतेक शेवटच्या वर्षाला होती. याशिवाय त्यावेळचे उगवते तारे, आजचे आघाडीचे कलाकार सहजगत्या आसपास वावरत होते. सहस्त्रबुद्धेंच्या परिचयातून आणि नंतर दृढ होत गेलेल्या नात्यातून अशा अनेक आठवणींचे कोश उलगडत राहतात. आमची वाटचाल इथवर झाली, हे सांगूनही विश्वसनीय वाटत नाही इतका ताजेपणा त्यात आजही टिकून आहे.    

Tuesday, August 24, 2010

‘तृतीय नेत्र’ – केव्हा, कुठे वाचाल !!


तृतीय नेत्र  उलगडत असताना पन्नास-साठ दैदिप्यमान ज्वलज्जहाल भडका आपल्या अंगावर येऊन धडकणार आहे. त्यात एकाहून एक मान्यवर लेखकांचे अग्निबाण, रायफली आणि अदृश्य चेटकिणी यांचा एकच मारा होणार आहे!
तृतीय नेत्र हे पुस्तक लोकल प्रवासात किंवा निवांत दुपारी वाचण्याचे नाही. घरात कुणी नसताना, अपरात्री मंद मेणबत्तीच्या उजेडात वाचावयाचे पुस्तक आहे. बाहेर निसूर शांतता असेल. त्यात कडकडणारी वीज वाजावी किंवा बागेतल्या झाडाची अनिवार सळसळ व्हावी, अशा वेळी वाचावे.कुठेतरी अनवट फडफड – अशा वेळी वाचावे. टॉयलेटचा दिवा लावण्यासाठी स्वीचवर हात नेताना कुणी अक्राळ हसत स्वीचवरील आपले मनगट पकडले तर ? बंद टॉयलेटमधला दिवा आधीच लावून ठेवा मग दार बंद करा. घराच्या ओसरीतही जाऊ नका. विहीरीकडले दार नीट बंद करा.
वाड्यात राहात असाल तर वरच्या मजल्यावर जाऊन रात्री एकट्याने वाचा.
       महानगरात राहात असाल तर मध्यरात्री एकांतात वाचा.
मध्यम शहरात राहात असाल तर म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली बसून एकट्याने वाचा.
दहा फुटावरले धपापते कुत्रे तुम्हांला न्याहाळत असताना वाचा.
घरात वाचत असताना खिडकी बंद करू नका.
      खिडकी बंद केली तर टकटक नक्की होणार!!
पडदे उघडे ठेवले तर अंधारातून कोणीतरी पाहात असेल.
बंद केलेत तर पडद्यावर सावली येईल.
भुताची गोष्ट असो नाहीतर रहस्यकथा; तिची खुमारी अपरात्रीच्या अपुर्‍या
     उजेडातल्या एकटेपणातच वाढणार!! अंगावर सरसरून येणारा काटा आणि
     कानाची हाडे तटाक्कन उभी राहाणे, याशिवाय झटितिप्रत्यय तो कोणता??
     - हे केले नाही, तर काही मजा नाही!!
एकदा हे पुस्तक, मी म्हणतो, तसे वाचून पहा!!
                                  प्रो. डॉ. शिरीष गो. देशपांडे

सादर निमंत्रण.....


        दर्जेदार रहस्यकथांचा बादशहा म्हणून प्रसिद्ध पावलेल्या धनंजय मासिकाचे १९९० सालापासून वार्षिकात रूपांतर झाले. धनंजय प्रसिद्ध होण्याचा काळही नुसताच बदलला असे नव्हे तर त्याचे अंतरंगही बदलले. ते इतके की, इंग्रजीत निघणारे रिडर डायजेस्ट आपण मराठी अनुभवतो आहोत की काय, असे त्याचे प्रत्यंतर यावे. धनंजयच्या प्रांगणात आता खून आणि मारामारीच्या, गुन्हेगारीच्या, साहसांच्या कथांनीही आपला बाज बदलल्याचं दिसून येईल. त्याचजोडीने विज्ञानकथा, भूतकथा, अद्भूत कथा, अद्भूत सत्यकथा, भय कथा, गूढ कथा, आघात कथा, संशोधन कथा, वैद्यकीय गुन्हेगारी स्वरूपाच्या कथा अशा अनेक अंगांनी धनंजयचा अंक वाचनीय करण्यावर भर राहिला आहे. म्हणूनच वर्षागणिक धनंजयचा वाचकवर्ग वाढतो आहे, त्याचं प्रमाणही एवढं की, मागणी आल्यावर प्रती संपल्या असे नाईलाजाने उत्तर द्यावं लागतं, तेही दरसाली जास्त प्रती छापून ही वेळ येतेच. वाचकांच्या अलोट प्रेमामुळे आणि त्यांच्या आमच्यातील फोन, पत्ररूपी संवादाने आजवरची वाटचाल ही सुकर झाली, यात काहीच वाद नाही. त्याच जोरावर धनंजय यावर्षी पन्नासाव्या (५०) वर्षात पदार्पण करीत आहे. एकशे दोन वर्षांच्या दिवाळी अंकांच्या इतिहासात धनंजयचा पन्नास वर्षांचा भरीव सहभाग ही नक्कीच दुर्लक्षिता येणारी बाबच नाही.
        याच सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने राजेंद्र प्रकाशन आणि न.चिं. केळकर ग्रंथालय, मुलुंड यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवार, दि. २८ ऑगस्ट रोजी धनंजयची गेल्या ५० वर्षांतील प्रगती, त्यातील महत्त्वाचे टप्पे दर्शविणार्‍या कथांचा धांडोळा निवडक धनंजय – तृतीय नेत्र या स्मृतिग्रंथाच्या रूपाने घेतला जाणार आहे. या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र सेवा संघ, अपना बाझारच्या वर, जवाहरलाल नेहरू मार्ग, मुलुंड (प) येथे सायं ४.३० वा. होत आहे. या सोहळ्याला नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर, अनुराधा वैद्य, प्रो. डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे, रहस्यकथाकार यशवंत रांजणकर, ज्येष्ठ चित्रकार र. स. कंटक, रमेश के. सहस्त्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आपणा सर्वांना या कार्यक्रमासाठी आग्रहाचं निमंत्रण.
                                                        आपला......
                                                       राजेंद्र शंकरराव कुलकर्णी